जळगाव (वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालकल्याण विषयक विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान बालविवाह प्रतिबंध, लैंगिक छळविरोधी अंतर्गत तक्रार समित्यांचे कार्य, PCPNDT कायद्याची अंमलबजावणी, तसेच आशादीप केंद्र, रिमांड होम व पुनर्वसन संस्थांची कार्यक्षमता यावर सखोल चर्चा झाली.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी गस्त आणि जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश चाकणकर यांनी दिले. तसेच, प्रत्येक शासकीय कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करून त्यांचे प्रशिक्षण व नियमित कामकाज सुनिश्चित करण्यावर भर दिला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
PCPNDT कायद्यांतर्गत सोनोग्राफी केंद्रांची तपासणी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे अध्यक्षा अधोरेखित करत आहेत. आशादीप केंद्र, रिमांड होम आणि पुनर्वसन संस्थांची स्वतंत्र पाहणी करून सेवा अधिक प्रभावी करण्यावरही चर्चा सुरू आहे. चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा करत महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक समन्वयात्मक आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
