जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात व त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी तसेच निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात आहे.

आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांचे विविध खेळ घेण्यात येत असतात. नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून तो एक उत्तम नागरीक घडावा, त्यांच्यातील ताण-तणाव दूर व्हावा, उदासीनता, नैराश्य, मानसिक विकारांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांचे विविध बौद्धिक खेळ देखील घेण्यात येत असतात.

यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला. सदर उपक्रमात शिक्षक हिरीरीने सहभागी होत असतात. अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ व गिरीश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
