वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या चेअरमन चंद्रकांत बढे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचा गौरव करताना म्हटले की, “विज्ञान, खेळ, शिक्षण तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे मिळालेले यश म्हणजे शाळेच्या विकासाचे द्योतक आहे. या यशामागे शिक्षकांचे परिश्रम व मार्गदर्शन महत्वाचे आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. बँड पथकात त्यांचा उत्साहवर्धक स्वागतसोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सी.जे. तायडे यांनी केले. त्यांनी वर्षभरात शाळेने मिळवलेली विविध स्पर्धांमधील यशोगाथा आणि गुणवत्ता विकासाचे उपक्रम उलगडून सांगितले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत बढे होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव झोपे, सचिव चंद्रशेखर झोपे, सहसचिव प्रदीप भंगाळे, सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच प्राचार्य सी. जे. तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.आर. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन एम.एस. भंगाळे यांनी मानले.
यावेळी इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
