उस्मानाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभेची जागा महायुतीमध्ये अचानक अजित पवार गटाला गेल्याने उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. लोकसभेची उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत मिळावी, नाहीतर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रेवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून आले. तसेच या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उस्मानाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तरीही भाजपला जागा सोडा. मात्र, राष्ट्रवादीला जागा सोडू नका असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा परत घ्यावी आणि उमेदवार बदलावा असं कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी केली आहे.
लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदार संघ हा शिवसेनेचा गढ मानला जातो. परंतु, आता महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसला जागा सुटल्याने उमेदवारीवरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
